सद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम

Upasana Kendra

उपासना केंद्रांचे उपक्रम

१३ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळापर्यंत सांघिक उपासना भारतामध्ये ठिकठिकाणी केल्या जात असत. परंतु नंतर मात्र ह्याकडे दुर्लक्ष झाले व समाजात ही उपासना पद्धती विस्मृतीत गेली. सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्राची निर्मिती प्राचीन भारतातील ह्या सांघिक उपासनांचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतुनेच झाली.

आजमितीला सांघिक उपासना जगाच्या काना-कोपर्‍यापर्यंत पसरलेल्या आहेत. समविचारी श्रद्धावान लोकांच्या एकीकरणातून एक एक संघ तयार करण्याची जबाबदारी ही केंद्रे पार पाडत आहेत. सर्वधर्मीय आणि बहुभाषिक भारतीय नागरिकांमध्ये सामाजिक सुसंवाद प्रस्थापित करण्याचे जाणीवपूर्वक कार्य ह्या उपासना केंद्रात केले जाते. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू गुरुवारच्या प्रवचनांमधून जी शिकवण देतात त्याची कृतिपूर्ण अंमलबजावणी, त्याचा सराव उपासना केंद्रामधून केला जातो.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्राची पहिली उपासना ७ मे १९९७ अक्षय्यतृतीया ह्या दिवशी केली गेली. आज घडीला संपूर्ण जगात ६५५ उपासना केंद्रे आता स्थापन झाली आहेत आणि सर्वसामान्यपणे प्रत्येक महिन्याच्या सर्व शनिवारी उपासना केंद्रांवर उपासना केली जाते. काही ठिकाणी इंग्रजी, हिंदी, गुजराती व कन्नड भाषेतही उपासना होते. सर्व उपासना केंद्र सद्‍गुरू श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशनशी सलंग्न आहेत.

प्रत्येक शनिवारी उपासना सुरू व्हायच्या अगोदर सूचना दिल्या जातात. त्याचवेळी धूप दाखविला जातो. पहिल्या शनिवारी प्रत्येक महिन्यात स्वस्तिक्षेम संवादानंतर बापूंचे प्रवचनातील मुद्दे सांगणार्‍या क्लिप्स्‌ (Clips) १५ मिनिटे दाखविण्यात येतात. दुसर्‍या शनिवारी स्वस्तिक्षेम संवादानंतर पितृवचनाची CD दाखविली जाते व दोन महिन्यातून एकदा श्रध्दावानांना आलेले परमपूज्य बापूंचे अनुभव दाखविले जातात. त्यानंतर श्रद्धावान दर्शन घेतात व सर्वात शेवटी आरती होते. आरती ऐच्छिक असते. श्रद्धावानांना लोणी किंवा शेंगदाणे-खडीसाखरेचा अथवा दोन्हीचा प्रसाद दिला जातो. श्रध्दावानांना परमपूज्य बापूंच्या पादुकांचे व चण्डिकाकुलाच्या तसबिरीचे दर्शन घेता येते.

उपासना केंद्रावर चालणार्‍या अनेकविध भक्तीमय सेवांची व भक्तीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधीही श्रद्धावान भक्तांना मिळते.

दैनिक प्रत्यक्ष मध्ये दररोज छापून आलेला जप विशिष्ट वेळा लिहिण्यासाठी एक ठराविक भाग पेपरमध्ये असतो. तो लिखित जप केंद्रावरील ‘बापूंच्या पादुकांवर’ अर्पण करण्याची संधी श्रद्धावान भक्तांना मिळते. सच्चिदानंद उत्सवासाठी पूजनाला मिळणार्‍या सद्गुरुंच्या पादुकांची नोंदणी करून त्या पादुका घरी आणता येतात. तसेच उपासना केंद्रातील पादुकाही श्रद्धावान जप, पठण व पादुका पूजनासाठी घेऊन जातात.

भक्तीच्या कार्यक्रमांव्यतिरीक्त सेवेचे इतरही भक्तिमय कार्यक्रम श्रद्धावानांसाठी असतात. चरखा शिबीर, रक्तदान शिबीर, गोधडी बनविणे ह्यासारख्या सेवाकार्यक्रमांसाठी शिबीर घेतले जातात.

दिवाळीमध्ये वृद्धाश्रम, अनाथालय, गरीब व गरजू कुटुंबीय, मनोरुग्ण, अंधशाळा, कुष्ठरोगी, भटक्या-विमुक्त गरजू जमाती अशा सर्वांसाठी दिवाळीचा फराळ वाटप करण्याचे कार्य विविध उपासना केंद्रांद्वारे केले जाते. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी दिलेल्या १३ कलमी कार्यक्रमांपैकी अनेक प्रकल्प उपासना केंद्रांकडून नियोजनबद्ध आखणी करून राबविले जातात. त्यामध्ये –

१) अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ योजना

२) वात्सल्याची ऊब

३) विद्याप्रकाश योजना

४) चरखा

५) चारा योजना

६) गांडूळ खत प्रकल्प

७) गोविद्यापीठम्‌ श्रमदान सेवा

८) अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे वेगवेगळ्या सामाजिक सेवा

९) इको-फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करणे‍

अशा उपक्रमांचा समावेश आहे. सर्व उपासना केंद्रांवरचे श्रद्धावान ह्या विविध सेवांमध्ये सहभागी होतात.

समाजामध्ये भक्तीची बीजे रुजण्यासाठी ह्या सर्व उपासना केंद्रांचा महत्त्वाचा सहभाग आहे. भक्ती हा सेवेचा गाभा आहे. ह्याला अनुसरूनच मातृभूमीची सेवा करण्यासाठी श्रद्धावानांना शनिवारची उपासना व परमपूज्य बापूंचे पितृवचन प्रेरीत करते.

उपासना केंद्रांची सूची