श्री वर्धमान व्रताधिराज

‘वर्धमान शब्दाचा अर्थच मुळी काय आहे? वाढत जाणारा आणि वाढत नेणारा. वर्धमान शब्दामध्ये ह्या दोन्ही गोष्टी अंतर्भूत होतात. ह्या वर्धमान व्रताधिराजाच्या आसर्‍याने भौतिक, मानसिक आणि प्राणांतिक पातळीवर म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि तरल या तीनही पातळ्यांवरती जी अनेक केंद्रे, अनेक गोष्टी सुप्तावस्थेत असतात त्या सर्वांना जागृत केले जाते.’ या शब्दांत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांना या ‘वर्धमान व्रताधिराज’चे महत्त्व सांगितले आहे. २४ डिसेंबर २००९ रोजी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापूंनी) ‘वर्धमान व्रताधिराज’ ची कथा सांगून, या व्रताधिराजाचे महत्त्व अधोरेखित करून, हे व्रत श्रद्धावानांसाठी खुले केले.

श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही. श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे परमेश्‍वराच्या नऊ अंकुर ऐश्‍वर्य प्राप्त करुन घेण्याचा महामार्ग. श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे सर्व व्रतांचा मुकुटमणी. श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे सर्वसामान्यांपासून ते संतांपर्यंत, अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितापर्यंत, महापाप्यापासून ते पुण्यवंतापर्यंत प्रत्येकाला समानपणे भगवत् कृपेचा आधार व दुःखमय प्रारब्धाचा नाश प्राप्त करुन देणारे सर्वोच्च व्रत.

सद्‌गुरु बापूंनी ह्या व्रताधिराजाच्या उत्पत्तीची कथा सांगून त्याचे महात्म्य विषद केले. बापूंचे मानवी सद्‌गुरु श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये, दत्तगुरुंच्या चिंतनात व श्रीविठ्ठलाच्या भक्तीत सदैव रममाण असत. एके दिवशी श्रीविद्यामकरंद गोपीनाथशास्त्री पाध्ये ‘बुडती हे जन पाहवे ना डोळा| म्हणून कळवळा येतो त्यांचा॥ या अत्यंत श्रेष्ठ अशा अभंगावर निरुपण करीत होते. तो दिवस कार्तिकी एकादशीचा होता. बरोबरच्या निवडक मंडळींसह गोपीनाथशास्त्री निंबगावास गेले होते. निरुपण व कीर्तन संपले, परंतु श्रीगोपीनाथशास्त्रींच्या मनात मात्र ह्या शब्दांनी करुणेचे भावतरंग प्रवाहित होऊ लागले.

त्यांनी श्रीविठ्ठलाला गार्‍हाणे घालण्यास सुरुवात केली. हे विठ्ठला, हे भगवंता ह्या दीनबंधू संतांचा कळवळा लक्षात घे आणि आम्हा कलियुगातल्या मानवांवर कृपा करून ह्यापुढे येणार्‍या काळात कलीच्या दु:खदायक प्रभावापासून स्वत:ची सुटका करून सोपा मार्ग दाखव. आम्ही सामान्य मानव भक्ती करण्याचे वेडेवाकडे प्रयास करतो. परंतु ह्या प्रपंचाच्या भाराखाली दबलेला सामान्य मनुष्य भक्तीसुद्धा नीट करू शकत नाही.

श्रीगोपीनाथशास्त्रींनी ती संपूर्ण रात्र ह्या गार्‍हाण्यातच घालविली. स्वत:जवळील विठ्ठलाच्या मूर्तीला उराशी कवटाळून आपल्या नेहमीच्या आवडत्या स्थानी म्हणजे पांजरा नदीच्या तीरी त्यांनी ९ दिवस काही न खाता न पिता धरणे धरले. तेथूनच श्रीवर्धमान व्रताधिराज ह्या सर्व मानववंशाच्या परमसुखाचा व कल्याणाचा मार्ग त्यांना मिळाला. श्रीवर्धमान व्रताधिराज सर्व मानव वंशासाठी सुलभ होण्यासाठी श्रीगोपीनाथशास्त्रींनी सहस्त्र पौर्णिमापर्यंत अखंडपणे वर्धमान जप त्यांच्या वंशात चालू ठेवला.

श्रीवर्धमान व्रताधिराजाचे आपल्या आयुष्यात कमीतकमी २४ वेळा किंवा अठराव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतच्या वर्षाच्या संख्येच्या निम्या संख्येइतके वेळा पालन करणारी व्यक्ती जन्मभर अधिकाधिक पुण्यवान सुखी बनतेच. परंतु त्यास शांती व तृप्ती सदैव प्राप्त होते. संपूर्ण आयुष्यात कमीतकमी ९ वेळा किंवा आयुष्य वर्ष संख्येच्या एक चतुर्थांश संख्येइतके व्रतपालन करणार्‍या व्यक्तीच्या पंचमहापापांचे निरसन होते.

ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात कमीतकमी एकदा तरी मन:पूर्वक व्रताधिराजाचे पालन केले आहे, त्याच्या मार्गातील दु:खद घटनांचे दु:खदत्व कमी होते. एकापेक्षा जेवढ्या म्हणून अधिकवेळा ह्या सांवत्सरिक व्रताधिराजाचे पालन करता येईल तेवढ्या प्रमाणात मनुष्य ह्या भूलोकात अधिकाधिक सुखप्राप्ती व दु:खनिवृत्ती मिळवतो.

मार्गशीर्ष महिन्यातील दत्तजयंतीपासून सुरू होणारे हे व्रत कसे करावे, यासंदर्भात श्रीवर्धमानव्रताधिराज पुस्तिका उपलब्ध आहेत. या पुस्तिकेमध्ये व्रत कसे करावे यासंबंधी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या व्रताची एकूण ९ अंगे आहेत. ती पुढीलप्रमाणे:

१. व्रतकाल व पठण

२. वर्ज्य प्रकरण

३. तिलस्नानम्

४. त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम्

५. त्रिदोष धूपशिखा

६. त्रिपुरारी त्रिविक्रम भोग

७. इच्छा दान

८. पुरुषार्थ दर्शन

९. उद्यापनम्

यातील प्रत्येक अंग कसे पाळायचे, याविषयीची सविस्तर माहिती ’वर्धमान व्रताधिराज’ या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

मार्गशिर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती अशा पवित्र दिनी सुरू होणारे हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास स्वतःच्या उदरात सामावून घेते व आपोआपच नवीन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो व भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.