श्रीअवधूतचिंतन उत्सव

AniruddhaFoundation-Shree Avadhoot Chintan

 ‘उद्धरेत् आत्मना आत्मानम्।’

माझा उद्धार मला स्वतःलाच करायचा असतो. माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी मला स्वतःलाच आधी बदलावे लागते. पण त्यासाठी आवश्यकता असते माझ्या भक्तीची आणि सद्गुरुंच्या संकल्पाची व त्यातलाच एक संकल्प, म्हणजेच ‘श्रीअवधूतचिंतन’.

श्रीअवधूतचिंतन म्हणजे काय?

            

‘श्रीअवधूतचिंतन’ ही अतिशय क्वचित घडणारी घटना होती. अतिशय विलक्षण, अद्भुत आणि मनोहारी असे ह्याचे स्वरूप होते. श्रीदत्तयाग, नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा, सर्वतोभद्र कुंभयात्रा व कैलाशभद्र महापूजन ह्या सर्व गोष्टी एकत्रितरित्या म्हणजेच ‘श्रीअवधूतचिंतन’.

चार रसयात्रा व एक भावयात्रा, धर्मचक्राची स्थापना, व्यंकटेश, जगन्नाथ, गायत्री उत्सवगुरुक्षेत्रम्‌ची स्थापना तसेच आराधना ज्योती उपासना एका विशिष्ट क्रमाने पूर्ण होत गेल्या व त्यानंतरच श्रीअवधूत चिंतन उत्सव सुरु झाला.

श्रीअवधूत दत्तात्रेयांचे २४ गुरु म्हणजेच विश्वामधील अशी २४ तत्वे (चॅनेल्स), जी त्या महाविष्णूची – परमशिवाची – सद्गुरु दत्तात्रेयांची कृपा माणसाला मिळवून देतात. या २४ गुरुंचे महत्त्व या श्रीअवधूतचिंतन उत्सवातून श्रद्धावानांपर्यंत पोहोचविण्यात आले. इतकेच नव्हे तर ह्या गुरुंकडून काय स्वीकारावे आणि काय त्यागावे याची शिकवण देखील मिळाली.

श्रीअवधूतचिंतन उत्सवातील महत्त्वाचे पैलू म्हणजे श्रीदत्तयाग, नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा, सर्वतोभद्र कुंभयात्रा व कैलाशभद्र महापूजन. सर्व श्रद्धावानांना या चार उपासनांमध्ये मुक्तपणे सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

सदगुरु श्री अनिरुद्ध बापू देखील सर्व श्रद्धावानांसहित या उत्सवात व या चारही उपासनांमध्ये सहपरिवार सहभागी झाले होते.

श्रीदत्तयाग

‘श्रीदत्तयागा’मधून शरीराला, मनाला, बुद्धीला आणि प्राणाला सुरक्षाकवच  मिळते. तीन दिवस चालणारा हा दत्तयाग म्हणजे साधासुधा होम अथवा यज्ञ नव्हता, तर ही अतिशय सुंदर घटना होती. ह्या यागासाठी आधी तीन वर्षे एकूण अकरा व्यक्ती अनुष्ठान करीत होते. त्या व्यक्तींचे हे विशिष्ट अनुष्ठान विशिष्ट वेळेला पूर्ण झाले आणि त्यानंतर हा दत्तयाग केला गेला होता.

पूर्णशुद्ध, उर्जायुक्त वैदिक मंत्रांनी हा दत्तयाग केला जात होता. ह्यातून प्राप्त होणारे पुण्यफल प्रत्येक श्रद्धावानाला मिळालेले आहे.

तसेच ह्या दत्तयागाचे पुण्यफल म्हणजेच ‘धन्य धन्य प्रदक्षिणा’, विलक्षण प्रदक्षिणा अर्थात नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा, जी प्रत्येक श्रद्धावानासाठी, त्याला ग्रासलेल्या अनेकविध संकटांपासून, रोगजंतूंपासून संरक्षण करणारी रोगप्रतिबंधक लस प्राप्त करून देणारी होती.

अधिक माहिती येथे पहा – http://avadhootchintanutsav.blogspot.in/2014/09/shree-dattayag.html#

‘नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा’.

   

ह्या उत्सवातील ‘नियतीचक्रपरिवर्तन प्रदक्षिणे’मधून माणसाच्या २४ चॅनेल्सवर २४ प्रक्रिया करून, जे चॅनेल्स आपल्याला दुःखदायक, क्लेशकारक ठरणारे असतात त्यांना ह्या प्रदक्षिणेच्या निदिध्यासातून शुद्ध करून देणारी रोगनिवारक लस मिळाली. नियतीचक्रामध्ये प्रत्येक मनुष्य अडकलेला असतो. प्रत्येक माणसाची एक वेगळी नियती असते. ती त्याच्या देहाच्या प्रभामंडलाशी (ऑराशी) संबंधित असते.

माझ्या स्व-नियतिचक्राचे परिवर्तन करून आणण्याची जबाबदारी, सामर्थ्य, क्षमता, कर्तृत्व माझ्यातच आहे. माझी नियती व त्यानंतर माझ्या आजूबाजूची परिस्थिती मी नक्कीच बदलू शकतो. मला माझ्या नियतीचक्राशी टक्कर देता येते; पण त्यासाठी माझा माझ्या देवावर प्रचंड विश्वास असावा लागतो. हे नियतीचक्र बदलण्याची ताकद मला ह्या प्रदक्षिणेने दिली. म्हणूनच तिचे नाव आहे ‘नियतिचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा’.

अधिक माहिती येथे पहा – http://avadhootchintanutsav.blogspot.in/2014/09/niyatichakraparivartan-pradakshina.html

‘श्रीसर्वतोभद्र कुंभयात्रा’

‘श्रीसर्वतोभद्र कुंभयात्रा’ अर्थात सर्वतोपरी कल्याण करणारी यात्रा. भारतीयांच्या मनात हजारो वर्षांपासून एक अतिशय सुंदर ध्येय असते, ते म्हणजे ‘श्रीसर्वतोभद्र कुंभ यात्रा’. म्हणजे काय तर काशीला जाऊन तेथील गंगेचे पाणी कावडीत भरून रामेश्वराम्‌ला जायचे आणि त्या रामेश्वराच्या लिंगावर अभिषेक करायचा आणि रामेश्वरम् जवळील कन्याकुमारीचे पाणी अर्थात तीन समुद्र एकमेकांना मिळतात, त्या जागेवरून आणून ते काशीविश्वेश्वराला वाहायचे. याच यात्रेला ‘श्रीसर्वतोभद्र कुंभ यात्रा’ म्हणतात.

अधिक माहितीसाठी येथे पहा – http://avadhootchintanutsav.blogspot.in/2014/10/blog-post_89.html

‘श्रीद्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजन’

श्रीद्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजन’ अर्थात बारा ज्योतिर्लिंगांचे महापूजन. ह्यामध्ये बाराच्या बारा ज्योतिर्लिंगांचे पूजन श्रद्धावानांना करता आले. अशा ह्या बारा ज्योतिर्लिंगांचे पूजन केल्याने श्रद्धावानाला त्याच्यातील वाईट गोष्टी, वासना, दुष्प्रवृत्तींचा विनाश, प्रलय करण्याची व चांगल्या, शुभ, हितकारक गोष्टींचा प्रतिपाळ करण्याची संधी मिळाली. जीवनाचा विकास करणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विकास करणे व वाईट गोष्टींचा लय करणे, ही शिवशक्ती प्राप्त करण्याची संधी ह्या श्री द्वादश ज्योतिर्लिंग कैलाशभद्र महापूजनाने श्रद्धावानांना मिळाली.

नव-अंकुर-ऐश्वर्य प्राप्तीचा श्रीअवधूतचिंतन उत्सव

ह्या उत्सवातून श्रद्धावानांना उपलब्ध असणाऱ्या ह्या चतुर्विध गोष्टी आपल्या सर्व प्रयासांना सद्गुरुतत्वाचे बळ प्राप्त करून देऊन आपले जीवन सुखी, समृद्ध, समाधानी, आनंदमयी करणाऱ्या चार पायऱ्या होत्या (चतुर्वर्ग उपासना). असा हा अनोखा श्रीअवधूतचिंतन उत्सव दिनांक ५ मे २००९ ते दिनांक ९ मे २००९ असा पाच दिवस श्रीहरिगुरुग्राम येथे साजरा करण्यात आला होता. नव-अंकुर-ऐश्वर्य श्रद्धावानांना प्राप्त व्हावी यासाठी सद्‌गुरु श्री अनिरुद्धांच्या प्रयासातून श्री अवधूतचिंतन उत्सव साकार झाला.