स्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र

स्त्रिया अनेक क्षेत्रात पुढे जात आहेत. पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले आहे. पण आजही बर्‍याच स्त्रिया एकट्याने प्रवास करायला घाबरतात, अन्याय झाला तर त्याविरोधात आवाज उठवत नाहीत, तर दुसर्‍या बाजूला काही स्त्रियांना खूप काही करायचे असते, पण ‘मला हे जमेल की नाही’ ही भीती त्यांना वाटत असते. अशा वेळेस एका स्त्रीने पुढे येऊन या स्त्रियांमध्ये बदल करण्याचे ठरवले तर! हो. एक स्त्री. एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीला समजू शकते, तिच्या अडचणी जाणून घेऊ शकते, तिला घडवू शकते, तिच्यात उचित बदल घडवून आणते. प्रत्येक स्त्रीमध्ये सामर्थ्य असतेच, फक्त तिला त्याची जाणीव करून देऊन, तिचा आत्मविश्वास जागृत करून देऊन स्त्रीला एक स्त्री म्हणून समर्थ बनवण्यासच ‘आत्मबल’ असे म्हणतात.

स्त्रियांमध्ये विशेष कौशल्य दडलेले असते. वेळीच त्याला वाव मिळाला तर या स्त्रिया पुढे गेल्याशिवाय राहत नाहीत. ‘आत्मबल’ मध्ये नेमके हेच पहायला मिळते. पण हे आत्मबल म्हणजे नक्की आहे तरी काय? एका वाक्यात त्याची व्याख्या मांडता येणार नाही, असा हा विशाल प्रवास आहे. त्यासाठी ‘आत्मबल’ वर्गात प्रवेश घ्यावा लागेल.

आत्मबल वर्गाची स्थापना –

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध आणि त्यांच्या पत्नी सौ. स्वप्नगंधा (नंदा) अनिरुद्ध जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रियांच्या आत्मबल वर्गाची स्थापना झाली. ‘श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी’ या संलग्न संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. यातील स्त्रियांसाठीचा हा उपक्रम म्हणजे ‘आत्मबल-विकास केंद्र’. १९९८ साली पहिल्या आत्मबल वर्गाची घोषणा झाली. यावेळी आत्मबल वर्गात फक्त २८ स्त्रिया होत्या. २०१६-१७ सालापर्यंत १५०० ते १६०० स्त्रियांनी आत्मबलचे प्रशिक्षण घेतले आहे. अगदी औरंगाबाद, जळगाव, नंदुरबारहून स्त्रिया या आत्मबलच्या वर्गात सहभागी होतात. मुंबईबाहेर पुणे येथेही आत्मबलचे वर्ग घेतले जातात.

डॉ. सौ. स्वप्नगंधा (नंदा) अनिरुद्ध जोशी यांचा परिचय –

सौ. स्वप्नगंधा अनिरुद्ध जोशी यांनी मुंबई विद्यापीठामधून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. निसर्गोपचार या विषयातही त्यांना रस आहे. त्यांनी ब्रेल भाषेमध्येसुद्धा प्रावीण्य मिळविले असून त्यांनी स्वतः तीन वर्ष ब्रेल भाषा शिकविली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. सौ. स्वप्नगंधा जोशी स्त्रियांमध्ये आत्मविश्‍वास वाढविणारा ‘आत्मबल’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहेत. या उपक्रमांमुळे स्त्रियांमध्ये कमालीचा बदल झालेला पहायला मिळतो. इंग्रजी अजिबात येत नसणार्‍या स्त्रियांना दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असणारे इंग्रजी आत्मबल वर्गात शिकवले जाते, ज्यामुळे स्त्रियांची इंग्रजी बोलण्याबद्दलची भीती दूर होते.

आत्मबल वर्ग व त्याची रूपरेषा –

प्रवेशप्रक्रिया व कालावधी –
दरवर्षी श्रीहरिगुरुग्राम (वांद्रे) आणि शनिवारी उपासना केंद्रावर आत्मबल वर्गाची घोषणा होते. त्यानंतर आत्मबल वर्गाच्या नावनोंदणीची सुरुवात होते. आत्मबल वर्गासाठी स्त्रियांची निवड नंदाईच्या मार्गदर्शनाखाली होते. या आत्मबल वर्गाचा कालावधी सहा महिने असतो. दर शनिवारी श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल) वांद्रे येथे संध्याकाळी ३ ते ७ वाजेपर्यंत वर्ग घेतले जातात.

आत्मबल वर्गात घेण्यात येणारे उपक्रम –

१. नंदाईचे मार्गदर्शन –
अनेक विषयांवर नंदाई स्त्रियांशी संवाद साधते. नाते-संबंध, वेळेचा सदुपयोग, घरातील विजेच्या उपकरणांची देखभाल, स्वच्छता, स्वयंपाकघरातील टिप्स, पाककृती, व्यक्तिमत्व विकास यासारख्या विषयांवर नंदाईचे मार्गदर्शन मिळते. घर आणि नोकरी हे दोन्ही सांभाळताना स्त्रियांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत करताना मुलांना आणि कुटुंबाला कसा वेळ द्यावा? याचे मार्गदर्शन नंदाई करते. तसेच नोकरी न करणार्‍या स्त्रियांनी घरातली सर्व कामे योग्य वेळेत आटोपून उरलेला वेळ कसा व कुठे द्यावा, स्वतःमधले कौशल्य कसे जोपासावे यावरही नंदाई स्त्रियांना मार्गदर्शन करते.

इंग्रजी येणे ही काळाची गरज आहे. नाहीतर बदलत्या जागतिकीकरण्याच्या काळात आपण मागे पडू. बँक, पोस्ट किंवा अन्य कार्यालयांमध्ये अस्खलित इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचा आत्मविश्‍वास असला पाहिजे. यासाठीच आत्मबल वर्गात इंग्रजीवर विशेष भर देण्यात येते. ज्या महिलांना जराही इंग्रजी येत नाही त्यांच्यावर विशेष मेहनत घेतली जाते. तसेच त्यांना थोडे इंग्रजी येते त्यांना आवश्यकतेनुसार संभाषणाचे प्रशिक्षण दिले जाते.

साधारण १५ ते २० स्त्रियांच्या गटाला एका विषयावर प्रोजेक्ट दिला जातो. त्यानंतर त्याची सविस्तर माहिती मिळवून तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांना त्यावर एक नाटक तयार करून त्याचं सादरीकरण करायचं असतं. त्याच वेळी टाकाऊ वस्तुंचा योग्य वापर करून काही मॉडेल्स बनवायची असतात. या प्रोजेक्टसमध्ये संस्थेची तीर्थक्षेत्रे, बँकेचे / पोस्टाचे व्यवहार, होलसेल मार्केट, एस.टी., रेल्वे आणि एअरलाईन्स बुकिंग इत्यादींचा समावेश असतो. यामुळे स्त्रियांच्या मनातली स्टेजवरची भीती दूर होते. त्या आत्मविश्‍वासाने आपली स्वतःची मते मांडायला शिकतात.

आत्मबल वर्गात आपत्ती व्यवस्थापनाचा विशेष कार्यक्रम असतो. यात ‘अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ चे (एएडीएम) स्वयंसेवक आपत्ती आल्यास काय करायचे व काय टाळायचे याचे व्याख्यान आणि प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देतात.

स्त्रीरोगतज्ज्ञंचे व्याख्यान, विविध पाककृती, मायक्रोव्हेव्हज मायक्रोवेव्हचा वापर या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन या लेक्चर्सद्वारे मिळते. गांडूळखत निर्मितीचे महत्त्व या लेक्चर्समध्ये सांगितले जाते. तसेच बिया रुजवून रोपांच्या संवर्धनाबद्दलची माहिती या वेळी दिली जाते.

हस्तकलेच्या वस्तू कमीतकमी खर्चात सुंदर कशा बनवायच्या, याची प्रात्यक्षिके आत्मबल वर्गात शिकविली जातात. कंदील, पणत्या तयार करणे इत्यादी अनेक गोष्टी या आत्मबल वर्गामध्ये स्त्रियांना शिकविल्या जातात. त्यामुळे आत्मबलनंतर दिवाळीच्या वेळेस बर्‍याच स्त्रिया उत्साहाने या पणत्या आणि कंदील घरी बनवतात.

हस्तकलेच्या वस्तू, पाककृती स्पर्धेतील उत्तम पदार्थ, प्रोजेक्ट-मॉडेल्स, फाईल्स व स्त्रियांनी स्वतः तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते. हे प्रदर्शन अगदी पाहण्यासारखे असते. तसेच स्त्रियांनी तयार केलेल्या पाककृतींमधून काही निवडक पाककृतींवर पुस्तिका प्रकाशित झाली आहे.

दरवर्षी आत्मबलच्या प्रत्येक बॅचेसची पिकनिक आयोजित केली जाते. प्रत्येकीसाठी न्याहारी आणि जेवणाची सोय व्यवस्थितरित्या केली जाते. सर्व स्त्रिया या सहलीचा मनसोक्त आनंद लुटतात.

प्रत्येक स्त्रीला आत्मबल कोर्स पूर्ण केल्यावर त्या कोर्सचे सर्टिफिकेट प्रदान केले जाते.

आत्मबल स्नेहसंमेलन

सहा महिन्यांच्या आत्मबल वर्गानंतर स्नेहसंमेलन असते. कधी स्टेजवर उभ्या न राहिलेल्या स्त्रिया आत्मविश्‍वासाने या स्नेहसंमेलनात केवळ सहभागीच होत नाहीत, तर हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवितात.

या स्नेहसंमेलनात स्त्रिया एखाद्या विषयावर नाटक सादर करून त्या माध्यमातून बोधकर संदेश देतात, तसेच नृत्य, गायन आदि कलाही सादर करतात. एका सुंदर नृत्याने स्नेहसंमेलनाची सांगता होते.

आत्मबल महोत्सव

आत्मबलच्या १३ बॅचेस पूर्ण झाल्यानंतर ‘आत्मबल महोत्सवा’चे आयोजन केले गेले होते. १३ बॅचेस म्हणजेच अगदी सुरुवातीपासूनच्या बॅचमधल्या स्त्रिया या महोत्सवात सहभागी होणार होत्या.

५ आणि ६ नोव्हेंबर २०११ असे दोन दिवस हा ‘आत्मबल महोत्सव’ सोहळा पार पडला. पुणे-मुंबईच्या जवळपास १३०० स्त्रियांनी विनोदी चुटके, नृत्य, नाटुकले आणि बोधप्रद वा सामजिक विषयांवरील नाटके इत्यादी कार्यक्रम सादर केले. आत्मबलमुळे झालेल्या सकारात्मक बदलांबाबतचे स्त्रियांनी स्वतःचे अनुभव कथन केले होते. त्याची डॉक्युमेंटरी या महोत्सवात दाखविण्यात आली. आत्मबल झालेल्या प्रत्येक स्त्रीचा या महोत्सवात लहानसा का होईना सहभाग होता. ज्या स्त्रियांना स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी अजिबात वेळ नव्हता, अशा स्त्रियांसाठी ‘कार्निव्हल’ आयोजित केले होते.

या कार्निव्हलमध्ये १३ बॅचेस च्या प्रत्येक वर्षाची एक बॅच असे १३ ग्रुप होते. प्रत्येक ग्रुपला सदगुरु श्रीअनिरुद्धांनी दिलेली १३ कलमे प्रत्येकी एक प्रमाणे वाटून दिली होती. ते कलम त्यांनी सादर केले. सर्व स्त्रियांचा एकात्मिक भाव, त्यांचे सद्‍गुरुवरचे प्रेम, आदर, भक्ती असे सर्व भावनाविष्कार त्यांनी दिलेल्या मानवंदनेतून साकार झाले. हा भव्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आत्मबलच्या प्रत्येक स्त्रीने मेहनत घेतली. त्याचवेळी तिच्या कुटुंबाने दिलेला पाठिंबाही अतिशय महत्त्वाचा होता. शिवाय कुठलेही वादविवाद, भांडण तंटे न होता एकाच मंचावर एवढ्या मोठ्या संख्येने स्त्रियांनी एकत्र येऊन कार्यक्रम उत्तमपणे सादर करणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि ‘आत्मबल महोत्सवा’ मुळे हे शक्य झाले.

या आत्मबल उत्सवाची एक डिव्हिडीही बनवली गेली. या महोत्सवाचे सोशल मीडियावर खास वेब पेज तयार करण्यात आले होते. या पेजला छान प्रतिसाद मिळाला होता. स्वीडनहून पत्राद्वारे या आत्मबल महोत्सवाची दखल घेतली गेली होती.

आत्मबलमुळे झालेले बदल

काळाला आणि सभोवतालच्या परिस्थितीला अनुसरून दरवर्षी क्लासचे स्वरूप बदलत असते. खास गृहिणींसाठी आत्मबलमध्ये लागोपाठ दोन बॅचेस घेतल्या गेल्या होत्या. याला गृहिणींनी छान प्रतिसाद दिला होता. यातल्या बर्‍याच गृहिणी या ‘हाऊसवाईफ’ होत्या, पण आत्मबलने त्यांना ‘होममेकर’ ही नवी ओळख दिली. काही स्त्रियांना साधा टॅक्सी किंवा लोकलमधून प्रवास करता येत नव्हता. पण आत्मबलमुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्या एकट्याने प्रवास करू लागल्या. इतकेच नाही तर काहींच्या घरा-घरातला कलहही आत्मबल वर्गामुळे थांबला, त्यांचा संसार सुखाने होऊ लागला.

आत्मबल वर्गामुळे प्रत्येक स्त्रीला नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्यात दडलेले टॅलेंट बाहेर आले आहे. त्यांना अन्यायाविरोधात लढण्याची ताकद मिळाली आहे. प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने त्या पुढे जात आहेत. भक्तीची कास धरून येणार्‍या संकटांवर सहजरित्या मात करत आहेत; कारण त्या सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या ’वीरा’ आहेत.